Akole News : डिजेच्या अपघातात जखमी युवकाचा मृत्यू ! गावावर शोककळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Akole News : मिरवणुकीत डिजे वाहनाने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा काल सोमवारी (दि. १५) पहाटे मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

युवकाचा मृत्यू झाल्याची खबर गावामध्ये येताच धांदफळ खुर्द येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे. या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या ३ झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील किसन रंगनाथ खताळ यांचा मुलगा बिपीन याचा लग्न सोहळा (दि.५) जानेवारी रोजी संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे आयोजित करण्यात आला होता.

पारंपारिक पद्धतीने नवरदेवाला लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे (दि.४) जानेवारी रोजी विवाहस्थळी पाठविण्याचा कार्यक्रम सुरू होता.

मिरवणूक रंगात आलेली असतांना धांदरफळ गावातील सोसायटी जवळील उतारावर अचानक मिरवणुकीतील डिजेच्या वाहन चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. डिजे वाहन मिरवणुकीत घुसले. या वाहनाने मिरवणुकीत नाचणाऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले होते.

या अपघातामध्ये बाळासाहेब हरीभाऊ खताळ व भास्कर राघु खताळ (वय ४७) यांचा मृत्यू झाला होता. अभिजीत उर्फ गणेश संतोष ठोंबरे (वय २२, रा. धांदफळ खुर्द) हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकवर्गणीतून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याची झुंज अपयशी ठरली. काल पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभिजीत याच्या मृत्यूची बातमी धांदरफळ खुर्द येथे पोहोचताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस या गावांमध्ये पोहोचले आहे.