खंडित वीजपुरवठ्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला बसतोय फटका…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  शेती विज पुरवठा सारखा खंडीत होत असल्यामुळे राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत.

वाड्यावस्त्यांवर वीज नसल्याने पशुधनाचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. रब्बीची पिके शेवटच्या पाण्यावर आली आहे अन यातच विजेचे संकट पिकांना अडचणीत लोटत आहे, यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

दरम्यान तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावाला बाभळेश्वर येथील सब स्टेशनमधून विजपुरवठा होतो. शेतीसाठी वेगळा व गावठाण फीडरसाठी स्वंतत्र वीज पुरवठा केला जातो.

अनेकदा जिर्ण झालेली लाईन, लांब पल्ल्याचे अंतर अशा अन्य कारणांमुळे शेतीचा विज पुरवठा कायमच खंडीत असतो. दिवसा विज पुरवठा असल्यास आठ तासापैकी तासभरही विज शेतीसाठी मिळत नाही. वारंवार होणार्‍या बिघाडाचा फटका एका पाण्यावर आलेल्या पिकांना बसत आहे.

वीज पुरवठाच होत नसल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके सुकत आहेत. अगदी वाड्या वस्त्यांवर वीज नसल्याने पशुधनाचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत.

महावितरणच्या जबाबदार अधिकार्‍यांनी गावाला सुरळीत शेती विज पुरवठ्यासाठी जिर्ण झालेल्या मुख्य लाईनमध्ये सुधारणा करावी.

तसेच लांब पल्ल्याची वितरण व्यवस्था झाल्याने अंतर कमी करण्यासाठी बाभळेश्वर येथुन शेती विज पुरवठ्याचे स्वंतत्र दोन फीडर तयार करावेत, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकर्‍यांमधुन होत आहे.