आणखी वर्षभरच काम करणार! खासदार विखे असे का म्हणाले?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar Politics :- निवडणुका जवळ आल्यावर कामांचा आणि त्यातही भूमिपूजने, उद्घाटने आणि घोषणांचा धडका लोकप्रतिनिधींकडून सुरू होतो. या पार्श्वभूमीवर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगळीच घोषणा केली आहे.

‘गेल्या तीन वर्षांत भरपूर कामे केली. आणखी एक वर्ष असेच काम करणार. त्यानंतर शेवटच्यावर्षी मात्र असे नवे प्रकल्प आणण्याचे काम करणार नाही,’ अशी घोषणाच त्यांनी केली आहे.

अहमदनगरमध्ये डॉ. विखे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारमधील कामांच्या श्रेयवादाचा मुद्दा निघाला.

त्यावर टीका करताना विखे पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारने केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. कर्जत-जामखेडमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो.

अनेकांना फुकटेच श्रेय घ्यायला आवडते. निवडणूक जवळ आल्यावर खोटी आश्वासने, घाईघाईत भूमिपूजने केली जातात. प्रत्यक्षात ती कामे पूर्ण होतात का? हा खरा प्रश्न आहे.

त्यामुळे आपण ठरविले आहे, जी कामे पूर्ण होतील तीच आणायची, त्यांचे भूमिपूजून करायचे, तीच लोकांना सांगायची. आणखी वर्षभर काम करायचे. शेवटच्या वर्षात पूर्ण होऊ न शकणारी कामे आणायचीच नाहीत.

त्यावेळी लोकांना फक्त आतापर्यंत केलेली कामे सांगायची, असे आपण ठरविले आहे. ‘ ‘नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी विकास कामांसंबंधी आपले विचार जुळले आहेत.

त्यामुळे त्यांना सोबत घेऊन काम करीत आहे. इतर ठिकाणी असे होत नाही. कोठे त्यांना माझे विचार पटत नाहीत, तर कोठे मला त्यांचे विचार पटत नाहीत.

त्यामुळे जेथे विचार जुळतात, तेथे पक्षीय विचार बाजूला ठेवून काम करीत आहोत. अर्थात चुका झाल्या तर एकमेकांव टीकाही केली जाणारच,’ असेही विखे पाटील म्हणाले.