एसटीच्या संपावर निर्णय नाहीच, आज कोर्टात काय झालं?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022  Maharashtra News :- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च न्यायालयात आज निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र, तसा निर्णय झाला नाही.

विलीनीकरणाच्या मागणीविषयी तीन सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावर सरकारने काय निर्णय घेतला, यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश हायकोर्टाने सरकारला दिला.

यासाठी एक एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

सुनावणी दरम्यान कोर्टाने कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही सुनावले. सरकारचा अंतिम निर्णय होईपर्यंत एसटी कर्मचारी कामावर रुजू का होत नाही, आत्महत्या करून प्रश्न सुटेल का? असा प्रश्न कोर्टाने केला.

कोर्टाने अशी भूमिका घेतल्यास कर्मचारी खचून जातील, असे सदावर्ते म्हणाले. अधिवेशन सुरू असल्याने निर्णय घेण्यास विलंब होत आहे.

त्यामुळे सरकारतर्फे एसटी विलिनीकरणावर बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागण्यात आली. ती मंजूर करण्यात आली.