मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) कौर यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या वक्तव्यानंतर आणि शिवसैनिकांनी (Shiv Sainik) निदर्शने केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर बऱ्याच तक्रारी नवनीत राणा यांनी केल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही नवनीत राणा यांचा छळ होत असल्याचे म्हंटले आहे. या सर्व प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
नवनीत राणा यांना कोणत्याही प्रकारची हीन वागणूक दिली नाही. त्यांचा कोठडीत कोणत्याही प्रकारचा छळ झाला नाही, असं सांगतानाच राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिलं आहे. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल रिपोर्ट मागितला आहे.
त्यामुळे या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. लोकसभा अध्यक्षांना (Lok Sabha Speaker) याबाबतचा रिपोर्ट पाठवला जाईल असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.
मागासवर्गीय असल्यामुळे राणा यांना पाणी दिलं नाही अशी त्यांची तक्रार आहे. या संदर्भात मी चौकशी केली आहे. पण वस्तुस्थिती तशी दिसत नाही.
कुणाचं काही म्हणणं असलं तरी पोलीस कायद्यानेच निर्णय घेतात. कारवाई करतात असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
भोंग्यांबाबत काल बैठक झाली. त्यात सांगोपांग चर्चा झाली. त्यानंतरही त्यांना सभा घ्यायची असेल तर त्याबाबतचा निर्णय पोलीस आयुक्त घेतील. परवानगी द्यायची की नाही हा पोलीस आयुक्तांचा अधिकार आहे.
ते निर्णय घेतील. सरकार निर्णय घेणार नाही, असं सांगतानाच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कोणी करत असेल तर सरकार कारवाई करणार असा सज्जड इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत (Press Conference) पुढे बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, शुट अँड साईटच्या आदेशाची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. असे काही आदेश दिले असेल असं वाटत नाही. पोलिसांनी संरक्षण करायचं असतं.
महाराष्ट्र पोलीस किंवा सीआयएसएफ असेल अशा पद्धतीने निर्णय घेत नसतात. तरीही मी माहिती तपासून बोलतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील पोलीस कायद्यानुसार काम करतात. त्यांच्या अधिकारात काम करतात.
मुंबई पोलीस चांगल्या कामासाठी ओळखल्या जाते. ओळखली जाणार. प्रोफेशनली त्यांनी काम करावं. हे त्यांना सांगितलंय, असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.