प्रवक्त्याची निवड होणार परीक्षेतून, या पक्षाची अभिनव युक्ती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra news : पक्षाची बाजू मांडणारा प्रवक्ता हा संघटनात्मक महत्वाचा घटक असतो. माध्यमांसमोर बोलताना त्याला पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडावी लागते.

अर्थात ते कौशल्याचे काम असते. त्यामुळे यापदावर योग्य व्यक्तीच हवी, यासाठी ही निवड स्पर्धेतून करण्याची युक्ती युवक काँग्रेसने शोधली आहे.पक्ष प्रवक्ता निवडण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा घेऊन निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते व स्पर्धेचे महाराष्ट्राचे प्रभारी ऋषिकेश मिरजकर यांनी दिली.

या स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण नगर येथे महसूलमंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.यासंबंधी माहिती देताना मिरजकर म्हणाले, माध्यमांसमोर पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची निवड स्पर्धेतून करण्याचा निर्णय प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी घेतला आहे.

‘यंग इंडिया के बोल’ उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असून, त्यातून प्रवक्ता निवडला जाणार आहे. याच पद्धतीने राज्य व राष्ट्रीय प्रवक्त्यांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी नि:पक्षपातीपणे निवड करू शकणाऱ्या पंचांची नेमणूक करण्यात येणार आहे.