Uddhav Thackeray : “या कामाचं श्रेय अजित पवार यांना जातं”; मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांचं कौतुक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते नव्या जीएसटी भवनाच्या इमारतीचं (GST Bhavan Building) भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कौतुक केले तसेच महाराष्ट्राचे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला किती हातभार आहे हे देखील सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आधीच्या सरकारने या इमारतीसाठी पाठपुरावा केला होता. त्या सरकारमध्ये आम्ही होतो. पण चर्चा किती झाली माहीत नाही, असा टोला लगावतानाच गेल्या अडीच वर्षापासून आम्ही यावर काम करत होतो.

या कामाचं श्रेय अजित पवार यांना जातं. प्रत्येक गोष्टीला मुहूर्त लागावा लागतो. आज लागला असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे.

तसेच पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र (Maharashtra) हा देशाच्या आर्थिक स्थितीचा मजबूत आधार आहे. महाराष्ट्र आधार आहे हे नुसतं म्हणता येत नाही. तर ते आम्ही करून दाखवलं आहे. आजच्या प्रसंगी राजकीय बोलू नये असे संकेत आहेत.

पण बोलावं लागतं. वातावरण निर्मिती सुरू आहे. महाराष्ट्रात बजबजपुरी आहे. महाराष्ट्रात असं आहे, महाराष्ट्रात तसं आहे, असं सांगितलं जातं. महाराष्ट्राची बदनामी करण्याचं षडयंत्र आणि कारस्थान उघड उघड दिसत आहे.

महाराष्ट्र द्वेष्ट्यांना सांगायचं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला (Economy) महाराष्ट्र जो आधार देतोय, महाराष्ट्राचं योगदान जर बाजूला ठेवलं तर कदाचित तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आपल्या कारकिर्दीत अमूक गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत असं आपल्याला वाटत असतं. त्यापैकी ही एक वास्तू आहे. वास्तू कर हा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाठकणा आहे. करसंकलनात देशात महाराष्ट्र अव्वल आहे.

देशातील नंबर एक राज्य आहे. म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती आहे, तिचा महाराष्ट्र मोठा आधार आहे. हा आधार काव्य पंक्तित न ठेवता, शब्दात न ठेवता तो आधार आम्ही दाखवून देतो. दाखवून दिलेला आहे. म्हणून मला वाटतं राजकीय बोलू नये अशा प्रसंगी असं संकेत आहे असेही ते म्हणाले.

बदलत्या काळानुसार नवी वास्तू कशी असावी याचं नियोजन केलं आहे. अप्रतिम अशी वास्तू होणार आहे. त्या पलिकडे शब्द नाही. आपल्या राजकीय आयुष्यात आपण पाहिलं अनेक घोषणा होतात. गाजावाजा होतो.

नारळवाल्यांचा खप जोरात होतो. नारळ फोडतात. कोनशिला तशाच असतात. त्या शिलेला कोणी विचारत नाही. आपण केवळ नारळ फोडण्यासाठी भूमिपूजन करत नाही तर प्रत्यक्ष काम करत आहोत.

आपल्या कामांचं उदाहरण ठेवतो. आपल्यातील रुसवा फुगवा, कटुता निर्माण व्हावी अशा काही लोक मनातल्या मनात गुढ्या उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही. कामाच्या गुढ्या उभारत शकत नाहीत.

मग सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात. त्याला आपण हे दिलेलं आपल्या कृतीतील चोख उत्तर आहे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लागलेला आहे.