Railway News : पैशाच्या वादातून ५ कोटी रुपयांचे रेल्वे इंजिन मुंबईला पोहोचलेच नाही!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway News : आपल्या मागे असलेल्या डब्यांना मार्ग दाखवण्याचे काम इंजिन करत असते. गंतव्य स्थान मग ते कोणतेही असो तेथपर्यंत पोहोचवणे हे इंजिनचे काम असते. पण हरयाणावरून येत असलेले इंजिन मुंबईपर्यंत पोहचू न शकण्याचा प्रकार घडला आहे.

पण हे इंजिन रेल्वेच्या अडचणीमुळे नाही तर मालवाहतुकीतील पैशाच्या वादामुळे रखडले, ही विशेष गोष्ट म्हटली पाहिजे. हे इंजिन कालका येथून मुंबईला आणण्यात येत होते; परंतु पैशाच्या वादातून मालवाहतूकदाराने रेल्वे इंजिन मुंबईला पोहोचवले नाही.

हरयाणाहून मुंबईला ५ कोटी रुपयांचे रेल्वे इंजिन न पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी एका वाहतूकदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन महिन्यांपूर्वी कालका येथील ट्रेलरवर इंजिन लादण्यात आले होते, पण ते मुंबईला पोहोचले नाही, असे वडाळा टीटी स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकृत रेल्वे वाहतूकदार अनिलकुमार गुप्ता यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी पवन शर्मा या दुसऱ्या वाहतूकदाराला कालका येथे रेल्वे इंजिन पोहोचवण्याचे आणि तेथून दुसरे इंजिन मुंबईत आणण्याचे कंत्राट दिले होते. या कामासाठी गुप्ता यांनी शर्मा यांच्या कंपनीला ४ लाख २५ हजार रुपये द्यायचे होते.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की. शर्मा यांच्या कंपनीने , २ मे रोजी ट्रेलरवर इंजिन लादले; परंतु पैसे देण्यास उशीर झाल्यामुळे ते परळ यार्डमध्ये पोहोचवले नाही. शर्माने इंजिन राजस्थानमधील पेट्रोल पंपावर उभे आहे आणि सुमारे ६० हजारांच्या थकबाकीमुळे ते पाठवले नाही, असे पोलिसांना सांगितले. गुप्ता यांच्या तक्रारीवरून, आम्ही भारतीय दंड संहितेच्या विश्वासघात आणि फसवणूक या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.