मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई ! ३६ जिल्ह्यांतून प्रत्येकी ५० ट्रॅक्टर-ट्रॉली २५ डिसेंबरला मुंबईत धडकणार, ‘असे’ असेल नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची लढाई आता आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. याचे कारण असे की मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळेस उपोषण केले. दुसऱ्या वेळचे उपोषण सोडताना शासनाने २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु आता ही मुदत संपण्यासाठी अवघे १० दिवस राहिले आहेत. तरी देखील सरकारने त्यादृष्टीने कुठलीही ठोस पाउले उचलल्याचे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे आता मराठा समाज पुन्हा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

२५ डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरातून शेकडो ट्रॅक्टरचा मोर्चा घेऊन मुंबईत धडकण्याची तयारी सुरु झालीये. सोशल मीडियातून सध्या विविध मॅसेज फिरत असून त्यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती सुरु झाली आहे.

मुंबई नाकाबंदी

मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण घेण्यावर ठाम असून सरकार स्वतंत्र आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहे. त्यातच सरकारमधील एक मंत्री छगन भुजबळ मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण देण्यास आक्रमक विरोध करत असल्याने मराठा समाजात सरकारविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

त्यामुळे आता पुढील आंदोलन हे मुंबईची नाकेबंदी असणार आहे. आंदोलनासाठी सोलापूर, इंदापूर, पुणे, पनवेल, कल्याण, ठाणेमार्गे मुंबई मंत्रालय असा मोर्चाचा मार्ग असणार आहे.

असे असेल ट्रॅक्टर व कार्यकर्त्यांचे नियोजन

गावागावातून अनेक ट्रॅक्टर्स व कार्यकर्ते घेऊन मुंबईत जाण्याची तयारी केली जात आहे. राज्याच्या ३६ जिल्ह्यांतून ५० ट्रॅक्टर याप्रमाणे किमान १८०० पेक्षा अधिक ट्रॅक्टर आंदोलनात असणार आहेत.

एका ट्रॅक्टरमध्ये किमान १० समाजबांधव असतील असे नियोजन आहे. एक ट्रॅक्टर व ट्रॅलीसोबत दहा समाजबांधव, दहा दिवस पुरेल इतका अन्नशिधा सोबत ठेवण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. यासाठी २० डिसेंबरपर्यंत मोबाइलवर नाव नोंदणी करावी असे सांगितले जात आहे.

राजधानीचे शहर व राष्ट्रीय महामार्ग होतील जॅम

आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ५० ट्रॅक्टर मालकांनी स्वयंस्फूर्तीन नोंदणी केली असून इतर जिल्ह्यांतूनही प्रतिसाद मिळत आहे. एकाच वेळी शेकडो ट्रॅक्टर मुंबईच्या दिशेने गेल्यास राजधानीचे शहर व राष्ट्रीय महामार्गही जाम होतील असे सांगितलं जात आहे.