Fish Farming: सव्वा लाख रुपये पगाराची नोकरीला मारली लाथ आणि सुरू केला मत्स्यव्यवसाय! दोघ भाऊ कमवत आहेत लाखो रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fish Farming:- नोकरी आणि व्यवसाय यांच्यामधून जर निवड करायची राहिली तर प्रामुख्याने बरेच जण नोकरीला पसंती देतात. कारण कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता महिन्याला ठरलेला पैसा हा तुमच्या खात्यात येत असतो. कुठल्याही प्रकारचा उतार चढाव किंवा जोखीम किंवा नुकसानीची शक्यता नसल्यामुळे नोकरी करण्याला प्राधान्य दिले जाते. या तुलनेमध्ये जर आपण व्यवसायाचा विचार केला तर बऱ्याचदा अनेक पद्धतीचे नियोजन, नुकसान होण्याची भीती किंवा इतर प्रकारच्या जोखीम असल्यामुळे बरेच जण व्यवसाय करायला कचरतात.

परंतु समाजामध्ये असेही अनेक व्यक्ती पाहायला मिळतात जे चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडतात व व्यवसायामध्ये उडी घेतात. एवढेच नाही तर असे व्यक्ती व्यवसाय यशस्वी देखील करून दाखवतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बिहार राज्यातील  उमामगंज भागातील पडरिया या गावचे रहिवासी असलेल्या दोन भावांपैकी एका भावाने परदेशातील चक्क  सव्वा लाख रुपये प्रति महिना पगाराची नोकरी सोडली व स्वतःच्या गावांमध्ये मत्स्यव्यवसाय अर्थात मच्छी पालन सुरू केले. त्या व्यवसायाच्या माध्यमातून हे दोन्ही भाऊ लाखो रुपये तर कमवत आहेतच परंतु त्यांनी इतर तरुणांना रोजगार देखील निर्माण करून दिला आहे. याच दोघेही भावांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 दोन भावांनी सुरू केला मत्स्यव्यवसाय आणि कमवत आहेत लाखो रुपये

बिहार राज्यातील उमामगंज या परिसरातील पडरिया या गावचे करण सिंह आणि विशाल कुमार सिंह हे दोन भाऊ असून यातील करण यांनी दिल्लीतून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले व बारा वर्षे दुबई येथील एका हॉटेलमध्ये नोकरी केली. या ठिकाणी त्यांना जवळपास सव्वा लाख रुपये प्रतिमाह इतकी पगार होती.

परंतु दरम्यानच्या काळामध्ये लॉकडाऊन लागल्याने त्यांना घरी यायला लागले. ते घरी आले परंतु परत नोकरीच्या ठिकाणी न जाता त्यांनी गावातच व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली. त्यामुळे त्यांनी आधुनिक शेती व मत्स्य व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅनिंग केला व त्यासंबंधी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांशी सल्ला व मार्गदर्शन घेतले. यापैकी विशाल सिंह हे दिल्लीमध्ये व्यवसाय करत होते व लॉकडाऊनमुळे त्यांचाही व्यवसाय बंद पडला व ते देखील घरी आले.

त्यामुळे दोघेही भावांनी मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला व याकरिता दोन एकरचा एक खाजगी तलाव आणि 9 एकरचा तलाव भाडेतत्त्वावर घेतला व त्यामध्ये मच्छी पालन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून आता ते महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत असून त्यांनी इतर लोकांना देखील रोजगार मिळवून दिला आहे.

या व्यवसायाबद्दल माहिती देताना करणवीर सिंह यांनी म्हटले की सुरुवातीला दीड वर्ष त्यांना यामध्ये गुंतवणूक करावी लागली व मिळणारा पैसा नाही च्या बरोबर होता. परंतु हळूहळू या व्यवसायातून मिळणारा नफा वाढत गेला. सध्या परिस्थितीमध्ये मच्छी पालनात त्यांनी चांगले यश मिळवले असून बिहारच्या कृषी मंत्र्यांकडून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे.

सध्या वार्षिक दहा लाख रुपयांचा नफा ते मिळवत असून ते प्रामुख्याने मत्स्यपालनाकरिता रूपचंदा, इंडियन मेजर कार्प, ग्रास कार्प,पहाडी या प्रकारच्या माशांचे पालन ते प्रामुख्याने करतात व तयार माशांची विक्री ते स्थानिक बाजारपेठेतच करतात. हे दोन्ही भाऊ मिळून 15 ते 20 टनापर्यंत मासे विकत असून त्यातून ते लाखोंची कमाई करत आहेत. या व्यवसायामध्ये दहा ते पंधरा स्थानिक लोकांना रोजगार मिळाला असून वर्षाला दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यात मिळवत आहेत.

यावरून आपल्याला दिसून येते की एकीचे बळ आणि व्यवस्थित प्लॅनिंग राहिली तर व्यवसायामध्ये देखील नोकरीपेक्षा काही पटीने जास्त पैसा मिळवता येतो.