Ahmednagar News : अहमदनगरकरांनो, उष्णता वाढणार ! पारा चाळीशी पार होणार, अवकाळीचीही शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : मागील काही दिवसांत उष्णतेचा कहर वाढत चाललेला आहे. वातावरणातील वाढती गरमी असह्य होत आहे. अहमदनगरचा पारा ३८ अंशावर गेला आहे. लवकरच तो ४० अंशावर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तापमान वाढण्याची शक्यता

ढगाळ वातावरणामुळे वातावरणात उकाडा प्रचंड वाढला होता. दरम्यान, मंगळवारी शहराचे तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर बुधवारी शहराचे तापमान ४० अंशावर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नगर शहरासह परिसरात मार्च महिन्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत होता. मार्च महिन्यात ३१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. एप्रिल महिन्यात ३८ अंशावर तापमान गेले होते. महिनाभरात ७ अंशाने तापमान वाढले होते.

अवकाळीची शक्यता

पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

अवकाळी पावसाच्या धास्तीने कांदाउत्पादकांची चांगलीच धांदल उडाली. गेल्या आठ दिवसापासून भारतीय हवामान विभागाकडून सातत्याने नगर शहरासह जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात येत होता. नगर शहरासह जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाचे ढग दाटून आले होते.

दिवसभर कडक उन्हामुळे वातावरणात उकाडा जाणवत असताना, सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नगर शहराच्या काही भागात, तर पाथर्डी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. चार दिवसांपूर्वदिखील तुरळक अवकाळी पाऊस झाला होता.

मागील पाच वर्षांचा अवकाळीचा इतिहास

अहमदनगर जिल्ह्यातील मागील पाच वर्षांचा अवकाळीचा इतिहास जर पाहिला तर २०२०, २०२१ व २०२२ मध्ये एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला नाही. मात्र २०२३ व २०२४ मध्ये एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला आहे.