Monsoon News: राज्यात आज आणि उद्या ‘जोर’धारा, वाचा राज्याच्या कोणत्या भागात कोणत्या तारखेला पडेल पाऊस?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे जोर पकडला असून पेरणी योग्य पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे. पावसाला दुसरी सकारात्मक बाब म्हणजे अरबी समुद्रामध्ये असलेली गुजरात जवळची चक्राकार परिस्थिती उत्तर वायव्य भागाकडे सरकली असून यामुळे राज्यात अरबी समुद्रातील बाष्पाचा पुरवठा अधिक वाढणार आहे.

एवढेच नाही तर बंगालच्या उपसागरावर देखील आंध्र प्रदेश, ओरिसा लगत पुढील दोन दिवस कमी दाब निर्माण होऊन उत्तर वायव्येकडे प्रवास करणार आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून बाष्प मोठ्या प्रमाणात येणार असल्यामुळे  राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली आणि नाशिकचा पूर्व भाग, जळगाव आणि छत्रपती संभाजी नगरसह संपूर्ण मराठवाडा,

पश्चिम विदर्भात काळे ढग तयार होतील व बऱ्याच भागात मुसळधार तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच राज्याच्या काही तुरळक भागांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सात ते आठ जुलै पर्यंत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्‍यता आहे परंतु त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे.

 कशी राहील राज्यात पावसाची स्थिती?

12 आणि 13 जुलै नंतर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यामुळे राज्यातील काही भागात 14, 15 आणि 16 जुलै रोजी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून जुलै च्या शेवटी तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.  त्यामुळे राज्यातील मध्य भागामध्ये तीव्र स्वरूपाचा पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, नासिक, छत्रपती संभाजीनगर व अहमदनगरच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे.

तसेच सहा आणि सात जुलै रोजी जळगाव, धुळे आणि उत्तर महाराष्ट्रात वळीव पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नासिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी आठ जुलै रोजी सर्वत्र पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणाचा विचार केला तर या ठिकाणी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि पालघर या ठिकाणाहून काही भागात कमी तर काही भागात कमी अधिक पाऊस व काही ठिकाणी अती मुसळधार  पावसाची शक्यता  पाच, सहा आणि सात जुलै या दिवशी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी देखील दोन दिवस पाऊस पडणार असून 6, सात आणि आठ जुलै रोजी काही भागात वळीवाच्या सरी पडणार आहेत.

 मराठवाडा

आज पासून पुढील दोन दिवस लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड आणि धाराशिव इत्यादी ठिकाणी ढगाळ वातावरण राहून काही भागांमध्ये जोरदार वळवाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच सहा आणि सात जुलै रोजी मेघगर्जेनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

 विदर्भ

विदर्भाचा विचार केला तर संपूर्ण विदर्भामध्ये पावसात वाढ होण्याची शक्यता असून पाच, सहा आणि सात जुलै रोजी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भ, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशीम आणि बुलढाणा या ठिकाणी देखील मान्सून सक्रिय आहे.