साई संजीवनी प्रतिष्ठान नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री पवार व आमदार लंके यांचा जाहीर सत्कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना व योग्य दिशा मिळते. राजकारणात बदल घडत असतात. नव्याने नेतृत्व उदयास येऊन नवीन कार्यकर्ते घडत असतात.

मात्र गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. सरपंचांनी आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावे. ग्रामपंचायतच्या निवडणुका संपल्या असून, सर्व हेवेदावे सोडून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.

नेप्ती (ता. नगर) येथे साई संजीवनी प्रतिष्ठान व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री पोपट पवार व आमदार निलेश लंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात पद्मश्री पवार बोलत होते. बबनराव फुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर,

माजी पंचायत समिती सदस्य देवा (किसन) होले, सरपंच सुधाकर कदम, माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच संभाजी गडाख, वसंतराव पवार, शिवाजी होळकर, दिलीप होळकर, राजेंद्र होळकर, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते. पुढे पद्मश्री पवार म्हणाले की, नेप्ती व हिवरेबाजारचे सलोख्याचे संबंध असून, एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे.

गावासाठी अनेक विकासात्मक योजना असून, या योजना कार्यान्वीत करुन त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. नुकतेच गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून चांगला अनुभव मिळाला. या निवडणुकीचा उत्साह व ग्रामस्थांचे प्रेम पाहून अनेक कटकटी टळल्या. एक रुपयाही खर्च न करता गावात 90 टक्के मतदान झाले.

निवडणुकीत बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त झाल्या, तर आत्मविश्‍वास देखील वाढला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकात बंडू जपकर यांनी गावाच्या सर्वांगीन विकासासाठी साई संजीवनी प्रतिष्ठान देत असलेले सहयोग व सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

तर कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य गरजू घटकांना केलेली मदत, मोफत आरोग्य शिबीर, प्रतिष्ठानच्या सर्व युवकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा केलेला संकल्प, गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचा आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत रघुनाथ होळकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सिताराम जपकर यांनी करुन दिला.

यावेळी पद्मश्री पवार व आमदार लंके यांच्या हस्ते गावातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक, सेवानिवृत्त सैनिक व शिक्षकांचा तसेच गावात आरोग्य चळवळ चालविणार्‍या सपना वेलनेस सेंटरच्या टिमचा सन्मान करण्यात आला. तर दैठणे गुंजाळचे सरपंच बंटी गुंजाळ व टाकळी ढोकेश्‍वरचे सरपंच अरुणा खिलारी यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार निलेश लंके म्हणाले की, असंतुष्ट आत्मे व त्यांच्या व्यक्तीदोषामुळे राळेगण व हिवरेबाजार सारख्या गावात निवडणुका लागल्या. ज्या गावांनी देशाला दिशा देण्याचे कार्य केले असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपट पवार यांचे कार्य व ख्याती देशभर आहे. त्यांच्या कार्यातून सर्वच गावातील युवकांना दिशा मिळत आहे.

पारनेर मतदार संघात असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पद्मश्री पोपट पवार ही बलस्थाने असून, त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. साई संजीवनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन नेप्ती मधील रस्ते तसेच प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ होले यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, उपाध्यक्ष छबुराव फुले, एकनाथ होले, बंडू जपकर, सिताराम जपकर, शांताराम साळवे, बबन कांडेकर, छभुराव जपकर, राजू भुजबळ, दादू चौघुले, गजानन होळकर, बाबासाहेब भोर, तानाजी सप्रे, पोपट कोल्हे, विठ्ठल चौरे, मल्हारी कांडेकर, रामदास फुले, बाबासाहेब होळकर आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.