साईंचे दर्शन घेऊन निघालेले भाविक घरी पोहचण्यापूर्वीच देवाघरी गेले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-नगर – औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना आज घडली.

दरम्यान या भीषण अपघातात मृत्यू झालेले सर्व प्रवासी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आहेत. ते शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते.

परतीच्या प्रवासात ही दुर्घटना घटना घडली. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू शंतनू नायबराव काकडे ( वय २२, राहणार जयपूर, ता. मंठा, जिल्हा जालना), कैलास विठ्ठल नेवरे (वय २३), रमेश दशरथ घुगे वय २२),

विष्णू उद्धवराव चव्हाण (वय २२, तिघे राहणार मेसखेडा, ता. मंठा , जिल्हा जालना), नारायण दिगंबर वरकड (वय २४, रा. लाळतोंडी, ता. मंठा) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, सोमवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास हे मित्र शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन नेवासे मार्गी औरंगाबादकडे जात असतांना त्यांची कार (एमएच २१ बीएफ ७१७८) महामार्गावरील दुभाजक पार करून औरंगाबादहुन नगरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅव्हल (एमएच १९ वाय ७१२३) बसला देवगड फाटा परिसरात धडकली.

यात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच नेवाशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी आपले सहकारी पोलीस कर्मचारी अशोक नागरगोजे,

बबन तमनर, दिलीप कुर्‍हाडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

मात्र गंभीर जखमी आसल्याने सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही.

बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. पहाटेची वेळ असल्याने दोन्ही वाहने भरधाव वेगाने जात असावीत. त्यातच चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.