कर्तव्यदक्ष तलाठी भाऊसाहेबांना निरोप देण्यास एकवटले गाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-   राहुरी तालुक्यातील आंबी सजेचे कर्तव्यदक्ष तलाठी रूपेश कारभारी यांची नुकतीच ठाणे जिल्ह्यात बदली झाली. यानिमित्ताने अंमळनेर येथे गावचे पोलीस पाटील सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

गावाचा प्रशासकीय अधिकारी कसा असावा त्याचे मूर्तिमंत उदाहरण तलाठी कारभारी यांनी आंबी, अंमळनेर केसापूरकरांना दाखवुन दिले. आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या सेवेमध्ये तलाठी कारभारी यांनी समस्त गावकऱ्यांचे मने जिंकली.

अधिकारी पदाचा कोणताही बडेजाव न मिरवता जनतेचा सेवक म्हणून खऱ्या अर्थाने कामकाज केले. आपल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत कोणतीही तक्रार येऊ दिली नाही. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकार करून कोणतीही अडवणूक न करता ग्रामस्थांना तत्पर सेवा दिली.

मागील दोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवला असताना त्याची झळ आंबी, अंमळनेर, केसापूर या गावांनाही बसली. मात्र दिवस रात्र एक करून तलाठी कारभारी यांनी प्रशासकीय, आरोग्य विषयक कामकाज पार पाडताना प्रशासन व जनता यामधील दुवा म्हणून काम केले.

तलाठी रूपेश कारभारी यांना निरोप देण्यासाठी अंमळनेरचे पोलीस पाटील सुरेश जाधव, माजी सरपंच जेष्ठ नेते सतिष जाधव, अच्युतराव जाधव रायभान चाचा जाधव, प्रमोद जाधव, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जाधव, अशोक जाधव, भारत कोळसे, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे,

दत्तात्रय कोळसे, काकासाहेब डुकरे, ऍड. सागर कोळसे, नवनाथ कोळसे, शौकत इनामदार, कोतवाल सचिन रणदिवे, श्रीकांत जाधव, गणेश रोडे, पत्रकार संदीप पाळंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.