तब्बल ४०० मुली पोलिस ठाण्यात, काय आहे प्रकार..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagar News :- सहल’ म्हटलं डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे…थंडगार हवेची ठिकाणे…परंतु मुली-महिलांना निर्भय बनवणारी ‘कायद्याची सहल’ थेट तालुक्याच्या पोलीस ठाण्यात गेली तर कुणाला नवल वाटायला नको.

सहलीला निमित्त होते महिला दिनाचे. कायद्याची कलमे, निर्भयतेचे धडे देत उपक्रमशील पोलीस निरीक्षकांनी सुरू केलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

कर्जत शहरातील तब्बल ४०० मुलींनी आणि महिला शिक्षकांनी पोलीस ठाण्याच्या सहलीची अनुभूती घेतली यामध्ये अमरनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, सोनमाळी कन्या शाळेतील मुलींचा सहभाग होता. कायद्याच्या चाकोरीत राहून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी राबवलेल्या अनेक समाजपयोगी संकल्पना अक्षरशः शासनाच्या उपक्रमांनाही लाजवणाऱ्या आहेत.

महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी तर त्यांचा आवर्जुन उल्लेख केला जातो. असाच आगळा वेगळा उपक्रम म्हणजे पोलीस ठाण्यात काढलेली मुलींची सहल! मुलींनी निर्भय व्हावे, त्यांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या अनेक कायद्यांची माहिती व्हावी, अडचणीच्या काळात पोलिसांची मदत कशी मिळवावी?

,तक्रार नेमकी कुठे दाखल करावी? त्यासाठी कोणती कलमे आहेत?महिला प्रश्नांसाठी उभारलेले भरोसा सेल काय काम करते? ठाणे अंमलदार,गुन्हेगारी कक्ष, गोपनीय विभाग, तपासी अंमलदार याबाबतची सखोल माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुलींना दिली.

पोलीस आणि पोलीस ठाण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुली व महिलांची या उपक्रमामुळे भीती कमी झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया यावेळी मुलींनी व्यक्त केल्या. ‘मुलींना आपल्या राहत्या परिसरात,बस स्थानकावर,प्रवासात येता-जाता, शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात,ओळखीच्या नातेवाईकांकडून पाठलाग, अनोळखी फोनकॉल तसेच सोशल मिडीयाच्या व्हाट्सऍप,फेसबुक, टेलिग्राम,शेअर चॅटच्या माध्यमातून त्रास होत असतो.

परंतु बदनामी, शाळा कायमची बंद होण्याच्या भीतीने कसलीही तक्रार न देता निमूटपणे अन्याय सहन करतात मात्र पोलीस आपल्या संरक्षणासाठीच आहेत असे समजून मुलींनी निर्भय बनावे. सोशल मिडीयावर कुणीही आमिषाला बळी पडू नये’ असे आवाहन चंद्रशेखर यादव यांनी केले.

पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेली देशी-विदेशी सुशोभणीय झाडे, फुलझाडे, नायलॉन दोरीत एका रेषेत लावलेली वाहने, नियम मोडणाऱ्यांसाठी केलेल्या दंडाच्या तरतुदी अशा अनेक उपक्रमांनी सहलीच्या निमित्ताने आलेल्या मुली अक्षरशः भारावून गेल्या.

तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात जाऊन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे मुलींना निर्भयतेचे धडे देत आहेत.आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक उपलब्ध करून त्यांना अभय देत आहेत.त्यामुळे त्रास देणाऱ्या अनेक टवाळखोरांना चाप बसला आहे.

शाळा-महाविद्यालयातील मुलींना मोकळा श्वास घेणे त्यांच्यामुळे शक्य झाले आहे. भरोसा सेल आदींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र भीतीपोटी व कायद्याच्या अज्ञानामुळे मुली व महिला निमूटपणे अन्याय सहन करतात. अशा महिला-मुलींना निर्भय बनवण्यासाठी हा उपक्रम आम्ही वेळोवेळी राबवणार आहोत असे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.