जयश्रीला मोबाईलवर कॉल मॅसेज का करतो असे म्हणून तरुणाचे अपहरण करुन लुटले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका तरुणाला चार जणांनी जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण करून नेले. त्यानंतर तु मोबाईलवर कॉल व मॅसेज का करतो, असे म्हणुन शिवीगाळ करत केबल व लाकडी काठीने मारहाण केली.

तसेच १ लाख १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. राहुरी तालुक्यातील वडनेर येथे (दि.१३) एप्रिल रोजी ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ भाऊसाहेब भुजबळ (वय २७) हे राहुरी तालुक्यातील गंगापूर मधील माळेवाडी परिसरात राहत असून ऊस खरेदी विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

(दि.१३) एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आरोपी सचिन धोंडीराम खेमनर (रा. साकुर, ता. संगमनेर) हा साईनाथ भुजबळ यांना फोन करुन म्हणाला की, मी गंगापूर शिवारातील पेपर मील कंपनीजवळ येवून थांबलेलो आहे.

मला भेटायला ये, माझे तुझ्याकडे काम आहे. तेव्हा साईनाथ भुजबळ हे त्याला भेटण्यासाठी गंगापूर येथील पेपर मील कंपनीजवळ गेले. तेथे चार जणांनी मिळून साईनाथ भुजबळ यांचे अपहरण करत त्यांना जबरदस्तीने त्यांच्या चारचाकी वाहनात बसवून वडनेर येथील एका गायरान असलेल्या माळरानात नेले.

त्या ठिकाणी आरोपी साईनाथ भुजबळ यांना म्हणाले कि, तु जयश्री हीचे मोबाईलवर कॉल व मॅसेज का करतो. असे म्हणून साईनाथ भुजबळ यांना केबल, लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच तू जर आमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर आम्ही त्या मुलीला सांगून तुझ्यावर बलात्कारची केस टाकायला सांगू, अशी धमकी दिली. तसेच त्यांच्या खिशातील १ लाख १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढून घेतली.

या घटनेनंतर साईनाथ भाऊसाहेब भुजबळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून सचिन धोंडीराम खेमनर (रा. साकुर, मांडवे, ता. संगमनेर), सांरग जांभुळकर (रा. वडनेर, ता. राहुरी) व दोन अनोळखी इसम अशा चार जणांवर अपहरण, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.