आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अवधी गुरुवारपासून (दि.१८) सुरु होत आहे.

या दरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचारास मनाई आदेश जारी केले आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे नियुक्त आहेत. तर शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदार संघाची नामनिर्देशन पत्र अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील जिल्हाधिकाऱ्यांचे दालन येथे स्वीकारली जाणार आहेत. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची नामनिर्देशन पत्र शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारली जाणार आहेत.

लोकसभा निवडणूक संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश असणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जारी केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.