भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली ! दुप्पट होण्याचा अंदाज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India News : भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अर्थात यूएनएफपीएच्या अहवालातून वर्तवण्यात आला आहे. भारतातील १४४ कोटी लोकसंख्येत २४ टक्के संख्या ही शून्य ते १४ वर्षे वयोगटातील असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तर भारताची लोकसंख्या पुढील ७७ वर्षांत दुप्पट होण्याचा अंदाजही या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.यूएनएफपीएच्या ‘जागतिक लोकसंख्या २०२४’ च्या अहवालानुसार १४४.१७ कोटी लोकसंख्येसह भारत जगात अव्वल आहे, तर १४२.५ कोटी लोकसंख्येसह चीन दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतात वर्ष २०११ साली केलेल्या जनगणनेवेळी १२१ कोटी लोकसंख्या नोंदवण्यात आली होती. भारतात वर्ष २००६ ते २०२३ दरम्यान २३ टक्के बालविवाह झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शिवाय गरोदर माता मृत्यूदरात देखील लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. देशातील ६४० जिल्ह्यांमध्ये नुकतेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार जवळपास एकतृतीयांश जिल्ह्यांनी माता मृत्यू दर कमी करण्याचे सतत विकास लक्ष्य गाठले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार भारतीय लोकसंख्येत २४ टक्के संख्या ही शून्य ते १४ वयोगटातील, १७ टक्के १० ते १९ वयोगटातील आहे. १० ते २४ वयोगटातील २६ टक्के तर १५ ते ६४ वयोगटातील ६८ टक्के लोकसंख्या असून सात टक्के लोकसंख्या ही ६५ वर्षांवरील आहे. भारतातील पुरुषांचे आयुर्मान ७१ वर्षे तर महिलांचे आयुर्मान ७४ वर्षे आहे.