Farmer Scheme : महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान ; योजनेचे स्वरूप, अटी, पात्रताविषयी वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme : भारत हा कृषिप्रधान देश आहे. साहजिकच देशाची अर्थव्यवस्था ही देखील शेतीवर आधारित आहे. अशातच केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक तसेच गरीब शेतकरी बांधवांना आपले जीवनमान सुधारण्यासाठी वेगवेगळ्या बाबींअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

अशीच एक योजना आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन शेतमजुरांना तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जात.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे स्वरूप

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन शेतमजुरांना तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेत जमीन खरेदीसाठी अनुदानाची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना 50 टक्के बिनव्याजी कर्ज तसेच 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या लाभार्थ्यांना शासनाकडून शेत जमीन खरेदी करून त्यांच्या नावावर करून दिली जाते. या योजनेच्या मदतीने लाभार्थी कुटुंबाच्या पती किंवा पत्नीच्या नावावर जमीन केले जाते. लाभार्थी विधवा किंवा परीतक्त्या स्त्री असल्यास शेतजमीन खरेदी करून त्यांच्या नावावर केली जाते. या योजनेच्या माध्यमातून चार एकर कोरडवाहू तसेच दोन एकर बागायती शेतजमीन लाभार्थी शेतकऱ्यांना दिली जाते.

या योजनेच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे किमान वय 18 आणि कमाल वय साठ वर्ष असावे.

या योजनेचा लाभ केवळ अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील भूमीहीन शेतमजूर तसेच दारिद्र्यरेषेखालील शेतमजूरास लाभ दिला जातो. आधीच जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही.

या योजनेचा लाभ देताना परित्यक्ता आणि विधवा स्त्रियास प्राधान्य दिले जाते.

ज्या शेतकऱ्यांना आधीच गायरान किंवा सिलिंगच्या जमीन देण्यात आल्या आहेत अशा लोकांना याचा लाभ मिळत नाही.

या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जाते तसेच 50 टक्के बिनव्याजी कर्ज असते. कर्ज फेडण्याची मर्यादा दहा वर्षे लावून देण्यात आली आहे.

कर्ज फेडण्याची सुरवात कर्ज मंजूर झाल्यानंतर दोन वर्षांनी होते.

या योजनेचा लाभ घेताना संबंधित लाभार्थी स्वतः शेतजमीन कसेल असे करार पत्रक सादर करावे लागते.

तीन लाख रुपये प्रति एकर एवढ्या कमाल दरात शेत जमीन खरेदी करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावे केली जाते.

योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे :-

अर्जदार शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी योजना असल्याने सक्षम प्राधिकरणाचा अर्जदाराचा जातीचा दाखला.

अर्जदार शेतकऱ्याचा रहिवाशी दाखला.

अर्ज करताना रेशन कार्डची झेरॉक्स लागते.

अर्जदाराची आधार कार्डची झेरॉक्स.

अर्जदाराचे निवडणूक ओळखपत्र.

योजना ही भूमिहीन शेतकऱ्यांसाठी असल्याने भूमिहीन असल्याबाबतचा दाखला देखील आवश्यक असतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो.

शाळा सोडल्याचा दाखला लागतो.

दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी योजना आहे यामुळे असल्याबाबतचे सत्य प्रमाणपत्र लागते. 

शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याचे १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र यांसारखी इतर आवश्यक कागदपत्रे अर्जदार शेतकऱ्याला सादर करावी लागतात.

या योजनेसाठी इच्छुक अर्जदाराला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. यासाठी इच्छुक अर्जदाराने आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आव्हान जाणकारांकडून केले जाते.