Success Story: ब्रँड इज ब्रँड…! ओन्ली शेतकरी…! शेतकऱ्याचा पोरगा झाला वैज्ञानिक, इस्रो मध्ये झाली निवड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपल्या देशातील बहुसंख्य जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून असल्याने देशाची अर्थव्यवस्था सुद्धा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आपल्या अपार कष्टाच्या जोरावर जगाचे पालन पोषण करत आला आहे.

एवढंचं नाही तर देशातील अनेक शेतकरी पुत्र आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपले व आपल्या परिवाराचे नाव रोशन करत असतात. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) एका शेतकऱ्याच्या पोरानं देखील आपल्या अपार कष्टाच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर विपरीत परिस्थितीचा सामना करत वैज्ञानिक म्हणून इस्रो मध्ये आपली जागा पक्की केली आहे.

इस्रो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (Indian Space Research Organization) सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या मौजे कुरुल येथील शेतकरी पुत्र बालाजी धनाजी जाधव याची निवड (Farmers Son Became Scientist) झाली आहे.

यामुळे या शेतकरी पुत्राची संपूर्ण देशात चर्चा रंगली असून बालाजी यांनी सोलापूर जिल्ह्याचे नव्हे-नव्हे तर महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशात रोशन केले आहे. एका शेतकऱ्याच्या पोराची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याने यांची संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे. बालाजी धनाजी जाधव यांच्यावर सध्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. निश्चितच शेतकऱ्याच्या मुलाने थेट इस्रो पर्यंत मारलेली ही झेप इतर शेतकरी पुत्रांसाठी प्रेरणा देणारी बाब आहे.

बालाजी यांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कुरुल मध्ये झाले आहे. बारावीत बालाजी यांनी 89 टक्के गुण मिळवून संपूर्ण जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. यामुळे बारावीनंतर बालाजी पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बालाजी यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

स्पर्धा परीक्षा मार्फत बालाजी यांची इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीत मुख्य अधिकारी म्हणून निवड झाली. चांगली नोकरी मिळाली होती मात्र तरी देखील बालाजी यांचे स्वप्न खूप मोठे होते. त्यांना समाजासाठी काहीतरी करायचे होते, आपल्या आई-वडिलांचे नाव संपूर्ण देशात रोशन करायचे होते. म्हणून बालाजी यांनी चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठेची नोकरी असताना देखील पुढे अभ्यास चालूच ठेवला.

शेवटी आपल्या बुद्धिमत्तेच्या, जिद्दीच्या जोरावर बालाजी यांची थेट इस्रो मध्ये निवड झाली आहे. एका सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील बालाजी आज इस्रो मध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. शेतकऱ्याचा पोरगा आज तिरुअनंतपुरम येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे.

ही कुरुलवासीयांसाठी तर अभिमानाची गोष्ट आहेच पण याचा महाराष्ट्रातील जनतेला देखील मोठा अभिमान आहे. बालाजी यांच्या यशाबद्दल बालाजीचे व त्याचे वडील धनाजी जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. निश्चितच शेतकऱ्याची मुलं पण कुणापेक्षा कमी नाही हे बालाजी धनाजी जाधव यांनी दाखवून दिले आहे.