शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कुकडी, घोड, विसापूर व सीना धरणाचे आपल्या हक्काचे पाणी अबाधित ठेवण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा पाणी प्रश्नी कधीही भरून न येणारे नुकसान होईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व कालवा सल्लागार समिती सदस्य घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

भीमा उपखो-यातील जलसंपदा प्रकल्पांचे पुर्नर्विलोकन व पूर्ननियोजन करण्याकरिता शासनाने जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री. अविनाश सुर्वे यांचे अध्यक्षतेखाली दि. २० मे २०२१ रोजी समिती स्थापन केली असून ही समिती भीमा उपखो-यातील धरणांचा व लाभक्षेत्रातील विविध बाबींचा अभ्यास करणार असून

त्यात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ‘बदलता पाणी वापर व वास्तववादी सिंचन क्षमता’ या बाबींवर अभ्यास होणार असून समिती हा अहवाल तीन महिन्यात शासनास सादर करणार आहे त्यात आपल्या लाभक्षेत्रात पाणी मागणी कमी आहे व या भागातून अपेक्षित महसूल मिळत नाही

हे समितीच्या निदर्शनास आल्यास या भागात पाणी मागणी नाही म्हणून आपल्या वाट्याचे पाणी जाऊ शकते असे घडल्यास आपले कधीही न भरून येणारे नुकसान होणार असून भावी पिढी आपणाला कधीही माफ करणार नाही याचा गांभीर्याने विचार होणे नितांत गरजेचे आहे.

त्यामुळे सध्या असणा-या पाणी वापराची व त्या अनुषंगिक पाणी मागणी अर्जाची नोंद जलसंपदा विभागाचे दप्तरी असणे गरजेचे असून या वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी भरलेली असणे गरजेचे आहे त्याकरिता लाभक्षेत्रातील सर्वच सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यानी याबाबत पुढाकार घेऊन

जागृती करावी तरच आपल्या हक्काचे पाणी अबाधित राहील तरी याबाबतचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घेऊन शेतकरी व पाणी वापर संस्थांनी सतर्क होऊन तातडी करण्याची गरज असल्याचे श्री. शेलार यांनी पत्रकात म्हटले आहे.