मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेमधील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी नव्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असे संजय राऊत  म्हणाले आहेत.

अजून काहीच सुरू झाले नाही, राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी लोक मृत्यू पडत आहेत. अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचे लक्ष नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर पडलाय, राज्यपाल कुठे आहेत आता? घटनेचे पालन आता तरी राज्यपालांनी करावे, मंत्रालय ठप्प पडले आहे. शपथ घेऊन देखील कामकाज सुरू झाले नाही. मंत्री अजून का बनले नाही?, असे संजय राऊत म्हणाले.

 महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, राज्यपाल आता कुठे आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर याव्यात म्हणून पाठिंबा दिलेला नाही, आदिवासींप्रती असलेल्या भावनेपोटी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.