महाराष्ट्राची एप्पल बोरी दिल्ली दरबारी ! प्रयोगशील शेतकऱ्याने अँपल बोरातून कमवलेत 14 लाख ; दिल्ली, कोलकत्याची बाजारपेठ केली काबीज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतीतून लाखोंची कमाई करून सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. खानदेश प्रांतातील धुळे जिल्ह्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये असाच एक भन्नाट प्रयोग केला असून सध्या हा शेतकरी सर्व खानदेशात चर्चेचा विषय ठरत आहे.

खरं पाहता खानदेश प्रांत हा कापूस उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. मात्र धुळे तालुक्यातील न्याहळूद येथील एका शेतकऱ्याने शेतीमध्ये बदल करत पारंपारिक पिकाला बगल देत एप्पल बोर लागवड करून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. त्यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची अख्या पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.

न्याहळूद येथील प्रयोगशील शेतकरी कैलास रोकडे यांनी हा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे या प्रयोगशील शेतकऱ्याने उत्पादित केलेली बोर दिल्ली आणि कलकत्त्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जात आहेत. एप्पल बोर पिकातून आठ ते नऊ महिन्यात उत्पादन मिळण्यास सुरू होते.

पिकाची योग्य काळजी घेतली वेळोवेळी खत फवारणी दिली आणि रोकडे यांनी पहिल्या वर्षात प्रती झाड 38 ते 50 किलो पर्यंत उत्पादन मिळवलं. दुसऱ्या वर्षी मात्र यामध्ये मोठी वाढ झाली आणि आता 120 किलो पर्यंतचे उत्पादन एका झाडापासून रोकडे यांना मिळत आहे.

प्रयोगशील शेतकरी रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्पल बोरांना स्थानिक बाजारात 15 ते 16 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. मात्र दिल्ली आणि कोलकत्याच्या बाजारात हा दर 20 ते 30 रुपये प्रति किलो पर्यंत असतो. गेल्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या बाजारात याच दारात आपल्या एप्पल बोरांची विक्री केली आणि चांगली कमाई त्यांना यामुळे झाली.

पारंपारिक पिकांच्या शेतीत उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती असताना रोकडे यांनी केलेला हा एप्पल बोर शेतीचा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. रोकडे यांनी जवळपास आपल्या जवळपास सात एकर शेत जमिनीत बोर लागवड केली असून यातून त्यांना 14 ते 15 लाखांची कमाई होती.

याशिवाय रोकडे यांनी आपल्या दोन एकर शेतात आवळ्याची लागवड केली आहे यातून अडीच ते तीन लाखांची कमाई त्यांना होणार आहे. याशिवाय गोल्डन व्हरायटीचे सीताफळमधून त्यांना एक-दीड लाख मिळणार आहेत.

निश्चितच रोकडे यांनी फळबाग शेतीत साधलेली ही प्रगती इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार असून पारंपारिक पीकपद्धती ऐवजी जर शेतकरी बांधवांनी नगदी आणि फळ पिकांची लागवड केली तर त्यांना शेतीतून लाखोंची कमाई होऊ शकते हेच त्यांनी दाखवून दिल आहे.