जामखेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अनुदानापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळावे, अशी मागणी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी आ. प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरिता सरकारने जाहीर केलेल्या अनुदानासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

सदर शासन निर्णयानुसार ३५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आले होते. सदर अनुदान लाभ मिळण्याकरिता जामखेड तालुक्यातून एकूण २६८२ शेतकऱ्यांनी अर्ज बाजार समितीमध्ये दाखल केले होते; परंतु अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये १११३ अर्ज कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे अपात्र ठरविण्यात आले होते,

त्यामुळे जामखेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. अनुदानापासून शेतकरी अपात्र झाले असल्याचे समजताच बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी आ. प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अपात्र घरलेल्या शेतकऱ्यांना अनुदानास पात्र करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

अपात्र शेतकऱ्यांच्या अर्जाची फेरतपासणी करून त्यांना अनुदानास पात्र करावे व अर्ज केलेला कुठलाही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, अशी मागणी सभापती पै. शरद कार्ले यांनी मंत्री महोदयांकडे केली आहे.