जिल्हा बँकच्या निवडणुक : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले तर शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेची निवडणूक सुरू झाली आहे. जिल्हा बँक ही काही राजकीय पक्षांनी धुडगूस घालण्याची संस्था नाही, असा सल्ला ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडाख पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा बँक महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर ठेवण्याचा प्रयत्न स्व. मोतीभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले पाटील या दिवंगत नेत्यांसह आमच्या पिढीने केला आहे. संपूर्ण ग्रामीण भागाचे अर्थकारण, साखर कारखाने, सेवा सोसायट्या जिल्हा बँकेवर पूर्णपणे अवलंबून आहेत.

गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्हा बँकेवर बेकायदेशीर नोकर भरतीसह अनेक आरोप झाले. त्याचबरोबर जवळ जवळ १०० कोटी रुपये राहुरी साखर कारखान्याकडे थकलेले आहेत. ते वसूल होतील की नाही, हे माहीत नाही. अनुत्पादित कर्जाचे प्रमाण खूप वाढलेले आहे, ही चिंताजनक बाब आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे.

अशा अवस्थेत बँकेकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही गडाख यांनी व्यक्त केली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेत, त्यांच्यासह इतर नेत्यांनीही जिल्हा बॅँकेकडे लक्ष देण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने मातृसंस्था व कामधेनू असलेली

जिल्हा बँक बुडाली, तर जिल्ह्यातील साखर कारखाने सेवा सोसायट्या तसेच हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालावे. तसेच पक्षीय राजकारणविरहीत बँक सांभाळणारे सक्षम उमेदवार द्यावेत व बँक सांभाळणारा सक्षम अध्यक्ष द्यावा, तरच बँकेचे भवितव्य चांगेले असेल, अशी चिंता ज्येष्ठ नेते गडाख यांनी व्यक्त केली.

Leave a Comment