Successful Farmer: जाधव बंधूचा नांदच खुळा…! डाळिंब शेतीने उघडले यशाचे कवाड..! परदेशात निर्यात होतो डाळिंब, लाखोंची करताय कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणून का ओळखला जातो, कारण की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र हे जरी शास्वत सत्य असले तरी देखील देशातील शेतकऱ्यांची (Farmer) अर्थव्यवस्था ही आजच्या घडीला खूपच हालाखीची असल्याचे बघायला मिळत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकरी बांधवांना सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. कधी नैसर्गिक संकटांमुळे तर कधी सुलतानी दडपशाहीमुळे शेतकरी बांधवांना नेहमीचं संकटांचा सामना करावा लागतो. मात्र असे असले तरी विपरीत परिस्थितीत देखील देशातील अनेक शेतकरी बांधव शेतीतुन लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) मालेगाव तालुक्याच्या (Malegaon) जाधव बंधूंनी देखील अशीच काहीशी कामगिरी करून दाखवली आहे. तालुक्यातील सातमाने गावातील केवळ जाधव व प्रवीण जाधव या दोन बंधूंनी डाळिंब शेतीच्या (Pomegranate Farming) माध्यमातून यशाला गवसणी घातली आहे.

या दोन्ही बंधूंनी डाळिंब शेतीत पंचक्रोशीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ व प्रवीण जाधव यांच्या मते, त्यांचे वडील हयात असताना वडिलांचे केवळ जाधव यांना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न होते. मात्र केवळ दहावीत असताना त्यांच्या वडिलांचे अकस्मिक निधन झाले.

यामुळे वडिलांचे छत्र हरपलेल्या या जाधव बंधूंच्या खांद्यावर अगदी कोवळ्या वयात संसाराचा गाडा खेचण्याची जबाबदारी येऊन पडली. अशा परिस्थितीत केवळ जाधव यांना दहावीपर्यंत शिक्षण घेता आले तर प्रवीण यांनी सातवीपर्यंतच शिक्षण घेतले. अगदी कोवळ्या वयात जाधव बंधूंना शेतीमध्ये राबावे लागले.

वडील गेल्यानंतर सलग दहा वर्ष पंचक्रोशीत भीषण दुष्काळ पडला, याची झळ जाधवांना देखील बसली. जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित 32 एकर शेतजमीन होती मात्र भीषण दुष्काळामुळे जाधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र निश्चयाचे महामेरू हे दोघे बंधू विपरीत परिस्थितीत देखील संधी शोधू पाहत होते. यामुळे विपरीत परिस्थितीत देखील जाधव बंधूंनी बदल करण्यास सुरुवात केली.

जाधव बंधुंनी शेतीत बदल करण्याचे ठरवले मात्र सर्वात मोठा प्रश्न उभा झाला तो पाण्याचा यासाठी जाधव बंधूंनी आपल्या शिवारात तब्बल वीस कूपनलिका खोदल्या. पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर आता शेतीत पीक कोणते घ्यायचे यावर मंथन केले आणि अभ्यासाअंती डाळिंब पिकाची निवड करण्यात आली. डाळिंब लागवड करण्याच्या अनुषंगाने जाधव बंधूंनी 1992 साली 160 गणेश जातीचे डाळिंब लावले.

डाळिंब लागवड केल्यानंतर त्यांना डाळिंब शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागले. मध्यंतरी त्यांना डाळिंब शेतीतून देखील निराशा हाती आली मात्र न खचता त्यांनी यशस्वी वाटचाल पुढे चालूच ठेवली. डाळिंब शेतीत अनेक प्रयोग राबविले. नंतर पुढे चालून त्यांनी शेतजमीन खरेदी केली आणि डाळिंब लागवडीची व्याप्ती वाढवली. डाळिंब शेती कृषी तज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन ते घेत राहिले.

शेतीसाठी पाण्याचा कायमचा तंटा मिटवण्यासाठी त्यांनी तब्बल त्यांच्या शेतापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौसम नदीकाठी विहीर खोदली आणि तिथून पाईपलाईन करून आपल्या वावरात पाणी आणले. 2013 मध्ये आजूबाजूच्या परिसरात तेल्या नामक महाभयंकर आजाराने डाळिंब बागा धोक्यात आल्या. पंचक्रोशीतील अनेक डाळिंब बागायतदारांनी यावेळी आपल्या डाळिंब बागा काढून टाकल्या. मात्र जाधव बंधू अभ्यासू वृत्तीने तेल्या रोगाशी लढत राहिले आणि त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत डाळींब बागा वाचवल्या.

आजच्या घडीला जाधव बंधू यांना डाळिंब शेतीमुळे कृषिदूत नवीन ओळख मिळाली आहे. वडिलोपार्जित 32 एकर शेतजमीन होती आज जाधव बंधू यांच्याकडे 97 एकर शेतजमीन आहे. जाधव बंधूंनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या अपार कष्टाच्या जोरावर नव्याने 65 एकर शेतजमीन खरेदी केली आहे. या 97 एकर जमिनीपैकी पन्नास एकरात डाळिंबाचे पीक असून पाच एकरात तायवान जातीचे पेरू लावण्यात आले आहेत.

शिवाय 20 एकर शेत जमिनीची सुधारणाची कामे सुरू आहेत. जाधव यांनी आपल्या शेतात 35 मजुरांना काम देखील उपलब्ध करून दिले आहे. शेतात ट्रॅक्टर पासून ते ब्लॉअर पर्यंत सर्व अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध आहेत. यामुळे त्यांनी मजूरटंचाईवर मात केली आहे. जाधव बंधू यांनी उत्पादित केलेला डाळिंब व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. व्यापारी जाधव यांचा डाळिंब निर्यातदारांमार्फत बांगलादेश, आखाती देश व युरोपमध्ये पाठवतात.

परदेशांत जाधव यांचा माल निर्यात तर केला जातोच शिवाय देशांतर्गत बंगळूर, चेन्नई, दिल्ली, कोलकता आदी बाजारपेठांत जाधव यांचा डाळिंब पाठवला जातो. जाधव यांच्या डाळिंबाला गत तीन वर्षात 50 रुपयापासून ते 165 रुपये किलोपर्यंत दर मिळाला आहे.

डाळिंब शेतीत केलेल्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे सकाळ समूहाकडून त्यांना गौरव भुमिपुत्राचा हा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. शिवाय मालेगाव रोटरी क्लब यांच्यातर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार देखील जाधव यांना मिळाला आहे. निश्चितचं शेती व्यवसायात जाधव बंधूनी केलेली ही अभूतपूर्व कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.