माजी आमदार कोल्हे ह्या शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचा असुरी घेतायेत…

 

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोपरगावची जनता नेहमी कोपरगावच्या विकासाबरोबर होती आणि यापुढेही राहणार आहे. शहरातील नागरिकांच्या विकासाची कामे मार्गी लागावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोरोनाच्या संकटात देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.

मात्र याउलट माजी आमदार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आपल्या सत्ताधारी नगरसेवकांना विकासकामांना विरोध करायचे आदेश देवून कोपरगाव शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचा असुरी आनंद घेत असल्याची

टीका अपक्ष नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे. हाजीमेहमूद सय्यद यांनी म्हटले आहे की, साडे चार वर्षापूर्वी माजी आमदारांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी शहरवासियांना दाखविलेले

स्वप्न राज्यात व केंद्रात सत्ता असून देखील त्या पूर्ण करू शकल्या नाही त्यामुळे शहरातील सुज्ञ मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून घरी बसविले. सत्ताधारी आमदार असून देखील नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यामुळे पक्षात प्रतिमा मलीन झाली

याचा राग अजूनही माजी आमदारांच्या मनात धुमसत असून शहरातील नागरिकांविषयी त्यांच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्या द्वेषापोटी नगरपरिषदेत असलेल्या पाशवी बहुमताचा उपयोग शहरातील नागरिकांचा बदला घेण्यासाठी केला जात असून

शहरातील विकासकामांना पडद्यामागून माजी आमदारच विरोध करीत आहे. त्याचा त्यांना आज जरी असुरी आनंद मिळत असला तरी त्या आनंदावर कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदार नक्कीच विरजण घालतील असे सय्यद यांनी शेवटी म्हटले आहे.