“काही किडक्या डोक्यांच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून श्रीमंत शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागपूर : राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या उमेदवारी वरून नाट्यमय आणि टीका सत्र सुरु आहे. शिवसेनेने (Shivsena) संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी दिल्यांनतर संभाजी महाराज नाराज असल्याचे वृत्त आले होते. त्यांनतर भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

मात्र संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभं करण्यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी होती, असा गंभीर आरोप श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (shrimant Shahu chhatrapati) यांनी केला आहे.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या या आरोपानंतर भाजपवर (BJP) शिवसेनेने सडकून टीका केल्याचे दिसत आहे. मात्र भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व आरोपांना आणि ठिकाण उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही किडक्या डोक्यांच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून श्रीमंत शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली. अशा प्रकारची माहिती देऊन या लोकांनी एकीकडे संभाजी छत्रपती यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला.

तर दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजे यांच्यात काही तरी अंतर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला याचं दु:ख वाटतं असे देवेंद्र फडणवीस नागपूर मध्ये म्हणाले आहेत.

मला भेटण्यापूर्वीच संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा एक सन्मान आहे.

त्यामुळे त्यांनी कोणतंही मत व्यक्त केलं असलं तरी मी त्यावर बोलणार नाही. त्या संदर्भात स्वत: संभाजीराजेंनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. संभाजीराजेंनी ट्विट करून सांगितलंय की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो, मी जे बोललो ते सत्य बोललो.

ही प्रतिक्रिया पुरती बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते.

हे लोक एकीककडे महाराजांना अशी माहिती देऊन संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत. दुसरीकडे महाराज आणि युवराजांमध्ये काही तरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम करत आहेत. त्यांच्या या वागण्याबद्दल दु:ख आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, संभाजीराजे माझ्याकडे आभार मानायला आले होते. त्यापूर्वीच त्यांनी कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही. मी स्वतंत्र उभा राहणार आहे हे आधीच जाहीर केलं होतं.

मला भेटल्यावर त्यांनी हेच सांगितलं. मी कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही. माझी अपेक्षा आहे, आमच्या घराण्याची परंपरा पाहता. मागच्यावेळी राष्ट्रपती कोट्यातून मला राज्यसभेत पाठवलं.

तसंच सर्व पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिलं पाहिजे. त्यावेळी त्यांना मी आमच्या पक्षाचा निर्णय माझ्या हातात नसतो. आमच्या हायकमांडच्या हाती असतो.

पण तुम्हाला सर्वचजण पाठिंबा देत असतील तर अशा परिस्थितीत जरूर हायकमांडशी चर्चा करेल, असं मी त्यांना सांगितलं होतं. मला या व्यतिरिक्त काही सांगायचं नाही. काही लोक ज्या प्रकारचं राजकारण करतात ते उघडे पडतील असेही फडणवीस म्हणायला विसरले नाहीत.