कर्मवीर काळे कारखान्याची गाळप क्षमता वाढणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- स्पर्धेच्या युगात कमीत कमी खर्चात चांगल्या प्रतीची जास्तीत जास्त साखर उत्पादन करण्यासाठी आहे त्या प्लँटमध्ये, आहे

त्या जागेतच आधुनिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून दोन फेजमध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालक चैताली काळे यांच्या हस्ते आधुनिकीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार काळे बोलत होते.

ते म्हणाले, कारखान्याच्या स्थापनेत पुढाकार घेऊन शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताला प्राधान्य देत परिसराचा विकास करण्यासाठी माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांनी आशिया खंडातील सहकारी तत्वावर कोसाकाच्या उभारणीत मोलाचे योगदान देत सहकाराची विकासगंगा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली.

प्रवर्तकीय संचालक मंडळात महत्वाची भूमिका पार पाडून १९५५-५६ साली पहिला चाचणी गळित हंगाम घेतला. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कारखान्याची सुरुवातीला ८०० मे.टनाची गाळप क्षमता होती.

उसाच्या उपलब्धतेमध्ये सातत्य नसतानादेखील कारखान्याने ६६ वर्ष अविरतपणे सर्व प्रकारच्या संकटांना सामोरे जात गळित हंगाम यशस्वी केले आहेत. मागील ६०-७० वर्षात काळानुरूप योग्य त्या मशिनरी वाढवून आवश्यकतेनुसार बदल केल्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ४ हजार मे.टन आहे.

कारखान्याने शेतकऱ्यांना नेहमीच योग्य दर दिला आहे. यापुढेदेखील साखर उत्पादनात कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन फेजमध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

पहिल्या फेजमध्ये ११० मे.टन, ४५ केजी प्रेशरचा एक बॉयलर, मिल टेंडम, जनित्र संच आदींची उभारणी केली जाणार असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.