आता नागरिकच कोरोनायुद्धात उतरतील! जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा आत्मविश्वास!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आणि इतर सहभागी यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज फेसबुक संवादाद्वारे दिली.

नागरिकांच्या मनातील प्रश्नांना आणि शंकांना त्यांनी उत्तरे दिली, त्यांच्या शंकांचे निरसन गेले. त्यामुळे कोरोना विरुदधच्या या लढाईत आता नागरिकही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत उतरतील, असा आत्मविश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संवादाच्या माध्यमातून व्यक्त केला.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. याचसोबत लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्तेही झटत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

ही माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत जावी. कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे एखाद्या यंत्रणेबद्दलची खराब प्रतिमा तयार होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला. अनेक नागरिकांनी फेसबुक संवादात सहभाग घेत त्यांच्या मनातील प्रश्न विचारले.

यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, सध्या चाचण्यांची संख्या वाढत असल्याने रुग्ण संख्या वाढणार आहे. मात्र, यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. आपण रुगणांपर्यंत पोहोचून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेवढे रुग्ण वाढत आहेत, तेवढे किंबहूना त्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत.

नागरिकांनी या आजाराची लक्षणे जाणवल्यास जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असेही त्यांनी सांगितले. ज्या रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, मात्र ते बाधित आहेत, त्यांनी थेट जिल्हा रुग्णालयात न येता अशा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले पाहिजे.

जेणेकरुन गंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा वापरता येईल. विविध रुग्णालयातील खाटांची उपलब्धता याबद्दलही अनेक फेसबुक वापरकर्त्यांनी प्रश्न विचारले. त्याच अनुषंगाने उत्तर देताना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी येत्या २ – ३ दिवसांत पोर्टल तयार करुन जिल्ह्यातील तालुकानिहाय सर्व हॉस्पिटल्सची माहिती,

उपलब्ध बेडसंख्या त्यामध्ये देणार असल्याचे स्पष्ट केले. सार्वजनिक ठिकाणी वावरताना अजूनही नागरिक नियम पाळताना दिसत नाहीत, याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले. असे नागरिक इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचवत असल्याचे ते म्हणाले.

आपण सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे या बाबी पाळल्या पाहिजेत. त्यामुळे होणारा प्रादूर्भाव बर्‍याच अंशी आपण कमी करु शकू. जिल्ह्यात सुरुवातीला नागरिकांच्या घशातील स्त्राव चाचणी करण्यासाठी स्त्राव पुण्याला पाठवावे लागत होते.

त्यानंतर जिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळा सुरु झाली. प्रतिदिन ३०० चाचण्यांवरुन तेथील क्षमता आपण आता प्रतिदिन १ हजार इतकी केली आहे. याशिवाय, रॅपिड अॅंटिजेन चाचण्यांच्या माध्यमातून आपण कन्टेन्मेंट क्षेत्रातील नागरिकांच्या चाचण्या करीत आहोत. खाजगी प्रयोगशाळांच्या माध्यमातूनही चाचण्या होत आहेत.

त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचून बाधित असणार्‍यावर उपचार करत आहोत, असे सांगितले. आरोग्य यंत्रणांचे सबळीकरण, आरोग्य यंत्रणेतील समन्वय, खाजगी आरोग्य यंत्रणांची याकामी मदत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आदीबाबत आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन अव्याहतपणे कार्यरत आहे.

त्याची माहितीही द्विवेदी यांनी यावेळी दिली. खासगी रुग्णालयांनी त्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेले शुल्कच आकारावे, असे त्यांनी सांगितले. याकामी आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात घेतलेले विविध निर्णय,

रुग्णांची गैरसोय टळावी, यासाठी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून तालुका पातळीवर केलेले नियोजन आदीची माहिती दिली. गेल्या काही दिवसांत अहमदनगरचे कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची मागणी काही जणांकडून होत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत नाही,

तर आम्ही टेस्टिंग वाढवून रुग्णांचा शोध घेत आहोत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. नागरिकांसोबत संवाद साधताना त्यांनी अहमदनगरमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे कारणच सांगितले. सुरुवातीपासूनच कोरोना नियंत्रणात ठेवण्यात यश आलेल्या अहमदनगरची स्थिती जुलै महिन्यात कमालीची खालावली आहे.

जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग हा १०. १ वर गेल्यामुळे देशातील टॉप अकरा जिल्ह्यात अहमदनगरचा समावेश झाला होता. देशाच्या आरोग्य यंत्रणेच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली होती.

या अहवालात रुग्ण वाढत असलेल्या देशातील टॉप अकरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये राज्यातील एकमेव जिल्हा नगर होता. अहमदनगरमधील कोरोना रुग्णवाढ नेमकी कशामुळे झाली, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आज खुलासा केला.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment