‘सुशांतएवढी चर्चा `यांच्याही` मरण्यावर करा’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्यादाच प्रतिक्रिया दिली आहे. यावरून त्यांनी भाजपला लक्ष केलं आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध प्रश्नासंदर्भात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. यावेळी बोलताना शेट्टी यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्यामध्ये एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून टीका केली आहे. ‘सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला कलाकार होता, याबद्दल दुमत नाही.

पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होतेय, तेवढी दूध प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते,’ अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. राज्यात एकीकडे दूध आंदोलन पेटले असताना दुसरीकडे भाजप व इतर पक्ष सुशांतसिंह प्रकरणावर जास्त लक्ष देत आहेत का? असे विचारले असता राजू शेट्टी म्हणाले,

‘राज्यात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या, त्याबद्दल चर्चा करण्यास कोणाला वेळ नाही. शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही . एवढेच काय तर अनेक करोनाग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मेले, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पण एका नटाने आत्महत्या केल्यानंतर एवढी चर्चा होते.

तेवढी चर्चा आमच्या दुधाबद्दल, आमच्या ऊसाबद्दल, आमच्या जगण्याबद्दल, लॉकडाऊनमुळे ज्या कामगारांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांच्याबद्दल झाली असती तर माझ्यासारख्याला अधिक बरं वाटलं असतं. माझ्या आंदोलनावर ज्यांना टीका करायची आहे, त्यांनी खुशाल करावी. मी यावर यापूर्वीच खूप काही बोललो आहे.

आता त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, असेही ते म्हणाले. दूध प्रश्‍नावर राज्यामध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. ‘शेतकऱ्यांसाठी कोणी आंदोलन करीत असेल, त्या आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल, तर अशा आंदोलनाला आमची अजिबात हरकत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणखी कोणाला आंदोलन करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे.

मात्र आंदोलन करून त्यावर राज्य सरकारला टार्गेट करायचे व केंद्र सरकारच्या भूमिकेवर काही बोलायचे नाही, हे चुकीचे आहे. मग असे आंदोलन राजकीय नाही का, असा सवालही त्यांनी केला. दूध उत्पादक प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी देखील डोळेझाक केली आहे. दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत, असेही ते म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment