Nagpur Goa Mahamarg : समृद्धी महामार्गाचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाला असून आता याचा दुसरा टप्पा म्हणजे शिर्डी ते मुंबई डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे.
अशातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी तयारी जोरात सुरू झाल्या आहेत. या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन करणे हेतू सल्लागार समिती स्थापन झाली आहे. दरम्यान आज आपण 75 हजार कोटी रुपये खर्चून 760 km लांब उभारला जाणारा हा महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यात विकसित होणार हा मार्ग
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शक्तीपीठ महामार्ग हा सहा पदरी राहणार आहे. या मार्गाची लांबी 760 किलोमीटर राहणार असून रुंदी 100 मीटर एवढी राहील. दरम्यान या मार्गासाठी 75 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील तीन शक्तीपीठ परस्परांना जोडले जाणार आहेत. श्रीक्षेत्र महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रा देवी ही शक्तीपीठ यामुळे जोडले जाणार आहेत.
दरम्यान, या महामार्गामुळे राज्यातील 12 जिल्हे जोडले जाणार आहेत. यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुढे हा महामार्ग महाराष्ट्र – गोवा सीमेवर कोकण एक्सप्रेसला जोडला जाणार आहे.
या एक्स्प्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सध्या स्थितीला उपलब्ध असलेल्या मार्गाने नागपूर ते गोवा दरम्यान प्रवास करण्यासाठी 21 तासांचा कालावधी हा प्रवाशांना लागतो. मात्र हा महामार्ग बांधून तयार झाल्यानंतर फक्त 8 तासांत नागपूर ते गोवा दरम्यान प्रवास करता येणार आहे.