Soybean Bajarbhav : …अखेर सोयाबीनवरील स्टॉक लिमिट काढले ; पण सोयाबीन बाजारभावात वाढ होणार का? वाचा तज्ञ लोकांचे मत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : मित्रांनो, खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार कायमच उपाययोजना करत असते. 2021 मध्ये देखील खाद्यतेलाच्या किमती आकाशाला गवसणी घालत होत्या.

अशा परिस्थितीत त्यावेळी खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मित्रांनो सर्वसामान्यांना खाद्यतेल स्वस्तात उपलब्ध व्हावे या अनुषंगाने आठ ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर स्टॉक लिमिट निर्धारित केले.

केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय त्यावेळी अनेक राज्य सरकारांनी फेटाळून लावला. केंद्र शासनाने तेलबीया आणि खाद्यतेलावर निर्बंध लावले असले तरी देखील अनेक राज्यात केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे स्टॉक लिमिट ची अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी केंद्र शासनाने कठोर भूमिका घेत खाद्यतेल नियंत्रित करण्यासाठी लिमिट ठरवून स्टॉक लिमिट 30 जून 2022 पर्यंत लावली.

त्यानंतर यामध्ये अजून वाढ करण्यात आली आणि तेलबिया आणि खाद्यतेलावरील स्टॉक लिमिट 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम करण्यात आली. मात्र, खाद्यतेलाच्या किमती आता नियंत्रित झाले असल्याने केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावरील असलेली स्टॉक लिमिट काढून घेण्याचा निर्णय घेतला. निश्चितच केंद्र शासनाने 2021 मध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित राहण्यास मदत झाली.

मात्र या निर्णयामुळे तेलबिया उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे सोयाबीन समवेतच इतर सर्व मुख्य तेल बियांना बाजारात अतिशय कवडीमोल दर मिळू लागला. फेब्रुवारी 2022 पर्यंत सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळत होता. मात्र तदनंतर त्यामध्ये घसरण झाली. सद्यस्थितीला सोयाबीन बाजार भाव ५३१७ रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपले आहेत.

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत यामध्ये तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली आहे. मात्र अजूनही फेब्रुवारी महिन्याची तुलना केली असता सोयाबीनला कमी बाजार भाव मिळत आहे. दरम्यान केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर लावलेली स्टॉक लिमिट काढून घेतली असल्याने याचा सोयाबीन दरावर चांगला सकारात्मक परिणाम होईल का सोयाबीनचे बाजार भाव वाढतील का? याबाबत कृषी तज्ञांची विचारपूस केली असता, कृषी तज्ञ या निर्णयामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होईल याबाबत साशँक आहेत.

दरम्यान काही जाणकार लोकांनी मात्र केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्य तेलावरील स्टॉक लिमिट काढली असल्याने सोयाबीन दराला उभारी मिळू शकते असा विश्वास दर्शवला आहे. निश्चितच कृषी तज्ञांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत.

अशा परिस्थितीत सोयाबीनला या निर्णयामुळे चांगला दर मिळतो का हे तर येणारा काळ सांगेल. मात्र यामुळे सोयाबीन बाजारात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात याबाबत निदान शेतकऱ्यांच्या अपेक्षा तरी बळावल्या आहेत.