Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE :

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं निवडणुकीची मतमोजणी रखडली आहे. मतदानाच्या वेळी जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी मतपत्रिका दाखवल्यानं त्यांची मतं बाद करावीत, अशी मागणी भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली.

तर सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांची मतं बाद ठरवावीत, अशी मागणी करणारं पत्र महाविकास आघाडीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतं, याकडं लक्ष लागलंय. त्यानंतरच प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळातील लांबलेल्या मतमोजणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कोणी व का थांबवली? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच आधी ईडीचा डाव फसला, त्यामुळे भाजपाने आता रडीचा डाव सुरू केल्याचा आरोपही केला. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली.

संजय राऊत म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला. आम्हीच जिंकू, जय महाराष्ट्र!”

भाजपच्या रवी राणा आणि सुधीर मुंनगटीवार यांच्यावर महाविकास आघाडीनं आक्षेप घेतलाय. मविआनं तसं पत्रही निवडणूक आयोगाला लिहिलंय. रवी राणा मतदानावेळी हनुमान चालिसा घेऊन आले होते. तर सुधीर मुनगंटीवारांनी आपली मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळेंच्या हातात दिल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. काँग्रेस पोलिंग एजंट अमर राजूरकर यांनी हा आक्षेप नोंदवलाय. तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.

भाजपने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मत बाद ठरवण्याची मागणी केली आहे. राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक होतं.

पण जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. त्यामुळे या दोन्ही आमदारांची मतं बाद ठरवण्यात यावीत, अशी मागणी पराग अळवणी यांनी केली होती.